Home Breaking News एकल’ महिलांच्या सन्मानाचे नवे पर्व; हळदीकुंकवाच्या माध्यमातून २५ हजारांहून अधिक महिलांचे सर्वांगीण...

एकल’ महिलांच्या सन्मानाचे नवे पर्व; हळदीकुंकवाच्या माध्यमातून २५ हजारांहून अधिक महिलांचे सर्वांगीण सक्षमीकरण

0
34

 

 

जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व ‘उमेद’चा पुढाकार

गडचिरोली  : दि. १७ जानेवारी २०२६ :समाजातील रूढी-परंपरांमुळे अनेकदा उपेक्षित ठरणाऱ्या एकल, विधवा व परित्यक्त्या महिलांना सन्मानाचे स्थान देत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाने मकर संक्रांतीच्या निमित्ताने ‘हळदीकुंकू’ उपक्रमाच्या माध्यमातून एक नवे सामाजिक पर्व सुरू केले आहे. सामाजिक समावेशकतेचा संदेश देणारा हा उपक्रम महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला नवी दिशा देणारा आहे.

सामान्यतः ज्या महिलांना समाज हळदीकुंकवाच्या कार्यक्रमांपासून दूर ठेवतो, अशा एकल महिलांसाठी शासनाने जाणीवपूर्वक जिल्हाभर हळदीकुंकू मेळाव्यांचे आयोजन करून त्यांच्या आत्मसन्मानाला नवे बळ दिले आहे. या माध्यमातून सण-उत्सवांच्या आनंदात त्यांचा सन्मानपूर्वक सहभाग निश्चित करण्यात आला आहे.

एकाच छताखाली सर्व विभागांचा समन्वय

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हा परिषद, महिला व बालविकास विभाग, महसूल प्रशासन, शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांचा प्रभावी समन्वय साधण्यात आला आहे. सामाजिक परिवर्तनासोबतच एकल महिलांचा आत्मसन्मान व आर्थिक स्वावलंबन वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

२५,७३२ एकल महिलांचे सर्वेक्षण; योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत

जिल्हा परिषदेने नुकत्याच केलेल्या विशेष सर्वेक्षणानुसार गडचिरोली जिल्ह्यात एकूण २५,७३२ एकल महिला असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा थेट लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाने सुनियोजित कृती आराखडा राबविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये

शासकीय कागदपत्रे : आधार कार्ड, मतदार यादीत नाव नोंदणी, बँक खाते उघडणे, जात प्रमाणपत्र.

आर्थिक सक्षमीकरण : उमेद अभियानांतर्गत कार्यभांडवल, समुदाय गुंतवणूक निधी व बँक लिंकेजद्वारे स्वयंरोजगारासाठी सहाय्य.

सामाजिक सुरक्षा : संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व अपंग व्यक्ती कल्याण योजनांचा लाभ.

आरोग्य व निवारा : आयुष्यमान भारत कार्ड व प्रधानमंत्री आवास/घरकुल योजनेत प्राधान्य.

बालसंगोपन : एकल महिलांच्या १८ वर्षांखालील मुलांसाठी बालसंगोपन योजनेचा आधार.

प्रत्येक तालुका व प्रभाग स्तरावर मेळावे

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना लेखी निर्देश देऊन प्रत्येक तालुका व जिल्हा परिषदेच्या ५१ प्रभाग स्तरावर एकल महिलांसाठी रोजगार व सक्षमीकरण मार्गदर्शन मेळावे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या महिलांकडे आवश्यक शासकीय कागदपत्रांची कमतरता आहे, ती तातडीने पूर्ण करून देण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या असून, एकही एकल महिला शासकीय लाभांपासून वंचित राहणार नाही, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

मेळाव्यात धनादेशांचे वाटप व मार्गदर्शन

समाजकल्याण सभागृह, गडचिरोली येथे नुकतेच संपन्न झालेल्या गडचिरोली तालुक्यातील मेळाव्यात श्रीमती स्मिता चौधरी, बहिणाबाई आत्राम, विमल मडावी व शशिकला दुमाने या एकल महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे म्हणाले, “आरोग्य, शिक्षण व आर्थिक स्वावलंबन हे सक्षमीकरणाचे प्रमुख स्तंभ आहेत. महिलांनी घरगुती जबाबदाऱ्यांसोबतच स्वयंरोजगार व उद्योगाकडेही वळावे, तसेच आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे. बार्टी आणि सारथी सारख्या विविध शासकीय व संस्थात्मक माध्यमांतून उपलब्ध असलेल्या संधींचा लाभ घेऊन प्रगती साधावी.”, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, प्रकल्प संचालक राहुल काळभोर, गट विकास अधिकारी अनिकेत पाटील, प्रफुल भोपये, भारतभूषण धुर्वे व कविता गेडाम यांची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here