आलापल्ली :फुले-शाहू-आंबेडकर व मान्यवर कांशीराम यांच्या विचारधारेतील ज्येष्ठ कार्यकर्ते गणपतजी तावाडे यांच्या अपघाती निधनानंतर आलापल्ली येथे झालेल्या तीव्र संतापानंतर अखेर प्रशासनाच्या आश्वासनानंतर चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले.
दि. ९ डिसेंबर २०२५ रोजी आलापल्लीतील वीर बाबुराव शेडमाके चौक परिसरात रस्त्याच्या कडेला फोनवर बोलत असताना मागून आलेल्या दुचाकीस्वाराने गणपत तावाडे यांना धडक दिली होती. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना प्रथम चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात, त्यानंतर नागपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ५.२५ वाजता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
पार्थिव आलापल्ली येथे आणताच संतप्त नागरिक, बहुजन समाज पार्टीसह विविध सामाजिक संघटनांनी न्यायाच्या मागणीसाठी चक्काजाम व ठिय्या आंदोलन सुरू केले होते. चारही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनात मयताच्या पत्नीही सहभागी झाल्या होत्या.


