भंडारा : भंडारा नगर परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत ईव्हीएममध्ये (EVM) गंभीर तांत्रिक घोळ आणि फेरफार झाल्याचा आरोप करत आज संपूर्ण भंडारा शहर आंदोलनांनी दणाणून गेले. ईव्हीएममधील या संशयास्पद प्रकारामुळे लोकशाहीचा खून झाल्याची भावना व्यक्त करत, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष वगळता सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. आंदोलकांनी चक्क ईव्हीएमची अंत्ययात्रा काढून निवडणूक प्रशासनाचा तीव्र निषेध केला.
शहरातील हुतात्मा चौक येथून या मोर्चाला सुरुवात झाली. भंडाऱ्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच शिंदे सेना, ठाकरे सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट (शरद पवार व अजित पवार) आणि सर्व पराभूत उमेदवारांनी खांद्याला खांदा लावून हा लढा पुकारला. शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर, राष्ट्रवादी (शप) गटाचे जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष यावेळी अग्रभागी होते.मतमोजणी दरम्यान प्रभाग क्रमांक ३ मध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि अकल्पनीय प्रकार समोर आला: गायब माहितीः या प्रभागातील ईव्हीएमच्या कंट्रोल युनिटमधून उमेदवार करुणा ऋषी राऊत यांचे नाव आणि त्यांना मिळालेली मते पूर्णपणे गायब होती. नोटा (NOTA) पर्याय नाही: धक्कादायक म्हणजे मतदारांना उपलब्ध असलेला ‘नोटा’ हा पर्यायही मशिनमध्ये दिसत नव्हता. आरोप: एका उमेदवाराचे अस्तित्वच मशिनमधून पुसले जाणे, हा तांत्रिक बिघाड नसून जाणीवपूर्वक केलेली छेडछाड असल्याचा दावा सर्वपक्षीय नेत्यांनी केला आहे.नोडल ऑफिसर्सवर कारवाई: या घोटाळ्यासाठी कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा बळी न देता, मुख्य जबाबदार नोडल ऑफिसर आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे. संपूर्ण फेरनिवडणूक: एका प्रभागात मशिनमध्ये फेरफार होऊ शकतो, तर इतर निकालांवर विश्वास कसा ठेवायचा? त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करून ती पुन्हा घेण्यात यावी. उच्चस्तरीय चौकशीः ईव्हीएममध्ये हा बदल नेमका कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणत्या सॉफ्टवेअरद्वारे झाला, याची सखोल चौकशी व्हावी. या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या होत्या.भंडाऱ्यात पहिल्यांदाच भाजपला एकाकी पाडत सर्व विरोधी आणि मित्रपक्षांनी एकत्र येऊन ‘महायुती’ मधील अंतर्गत मतभेद बाजूला सारून प्रशासनाविरुद्ध रान उठवले आहे. “जर उमेदवाराचे नावच गायब होत असेल, तर ही निवडणूक नसून निव्वळ थट्टा आहे,” असा संतप्त सवाल आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केला.या भव्य मोर्चामुळे आणि ईव्हीएमच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रेमुळे जिल्हा प्रशासनाची मोठी कोंडी झाली आहे. आता राज्य निवडणूक आयोग या प्रकरणाची दखल घेऊन फेरनिवडणुकीचे आदेश देणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.