![]()
देशाच्या प्रगतीसोबत राज्यालाही मिळाले अभूतपूर्व प्रकल्प; मुख्यमंत्री फडणवीसांचे पंतप्रधानांचे अभिनंदन
::writing{variant=”document” id=”67284″} नवी दिल्ली, दि. १० :
देशाचे पंतप्रधान म्हणून सलग ४ हजार ३९९ दिवसांची ऐतिहासिक सेवा पूर्ण करणारे नरेंद्र मोदी हे नव्या भारताच्या उभारणीचे शिल्पकार ठरले असून त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासालाही नवी आणि क्रांतिकारी दिशा मिळाली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेच्या वतीने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत त्यांच्या दीर्घ, निरोगी आणि यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांचा ४३९९ दिवसांचा कार्यकाळ हा केवळ आकडा नसून भारताच्या सर्वांगीण विकासाचा सुवर्णकाल आहे. या काळात कोट्यवधी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यश आले, तर रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदरे, द्रुतगती महामार्ग आणि आधुनिक पायाभूत सुविधांचे अभूतपूर्व जाळे देशभर उभारण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले की, भारत आज जगातील अग्रगण्य अर्थव्यवस्थांपैकी एक बनला आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पना प्रत्यक्षात साकार होत असून संरक्षण क्षेत्रातही भारताने मोठी झेप घेतली आहे. एकेकाळी शस्त्रास्त्रांची आयात करणारा भारत आज हजारो कोटी रुपयांची संरक्षण सामग्री निर्यात करणारा देश बनला आहे. यूपीआय आणि डिजिटल पेमेंट प्रणालीच्या माध्यमातून भारताने जगासमोर डिजिटल क्रांतीचा आदर्श निर्माण केला आहे.
महाराष्ट्राच्या विकासासाठी पंतप्रधान मोदी यांचे विशेष योगदान अधोरेखित करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो प्रकल्प, रेल्वे आधुनिकीकरण, राष्ट्रीय महामार्गांचे जाळे आणि विविध सिंचन प्रकल्पांना केंद्र सरकारकडून मोठा पाठिंबा मिळाला आहे. पूर्वी केवळ कागदावर असलेले अनेक प्रकल्प आज प्रत्यक्षात साकार होत आहेत.
२०१५ च्या भीषण दुष्काळाच्या काळात पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष दिले. ‘जलयुक्त शिवार’ योजनेसह विदर्भ आणि मराठवाड्यातील १०० प्रलंबित धरण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. राज्याच्या समस्यांवर संवेदनशीलतेने काम करणारे नेतृत्व महाराष्ट्राला लाभले, हे राज्याचे भाग्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य सरकारच्या ३६ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफी योजनेची माहिती दिली. राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. यामध्ये बहुतांश पात्र शेतकरी समाविष्ट असून ९९ टक्के शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खतांच्या उपलब्धतेबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, जागतिक परिस्थितीमुळे काही निर्बंध लागू करण्यात आले असले तरी राज्यात सध्या शेतकऱ्यांच्या गरजेनुसार पुरेसा खतसाठा उपलब्ध आहे. कृत्रिम टंचाई टाळण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले असून कोणत्याही शेतकऱ्याला खतांच्या कमतरतेचा सामना करावा लागणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विकास आणि सांस्कृतिक वारसा यांचा समतोल साधत जागतिक स्तरावर नवे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे देशाच्या प्रगतीला नवी दिशा मिळाली असून महाराष्ट्रालाही विकासाची नवी गती प्राप्त झाली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी ठामपणे सांगितले. :::
५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा
३६ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर
दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ
९९ टक्के शेतकरी लाभासाठी पात्र