
गडचिरोली : भारतीय जनता पक्षाचा ४७ वा वर्धापनदिन अहेरी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात उत्साहपूर्ण व जल्लोषमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात जेष्ठ नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गुडेल्लीवार यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर भारतमाता व पक्षाच्या संस्थापकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
या प्रसंगी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांनी भाजपच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेत, देशाच्या विकासासाठी व सुशासनासाठी पक्षाने केलेल्या कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमात बोलताना पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नसून राष्ट्रहित, विकास आणि जनसेवेचा विचार मांडणारा मजबूत प्रवाह असल्याचे अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगती करत असून विविध लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणांवर विश्वास व्यक्त करत आगामी काळात संघटन अधिक बळकट करण्यासोबतच जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचा संकल्प केला. तसेच सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचाही निर्धार व्यक्त करण्यात आला.
वर्धापनदिनानिमित्त परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पक्षाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा देत आनंद साजरा केला.
कार्यक्रम उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि संघटनात्मक बळकटीचा संदेश देणारा ठरला.