Home Breaking News फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क येथे “गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती आणि इतिहास”...

फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क येथे “गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती आणि इतिहास” विषयावर चर्चासत्र संपन्न

0
35

 

फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क येथे “गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती आणि इतिहास” विषयावर चर्चासत्र संपन्न

गडचिरोली, दिनांक: 22/26 ; आदिवासी संस्कृती ही अत्यंत प्रगत आणि शाश्वत असून निसर्गाचा समतोल राखण्याचे कौशल्य या संस्कृतीने पिढ्यानपिढ्या जपले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सद्यस्थितीतील वनसंपत्ती ही केवळ आदिवासी समुदायाच्या निसर्गपूजक वृत्तीमुळे आणि जीवनशैलीमुळे टिकून असून, आधुनिक विकासाच्या प्रक्रियेत आदिवासी संस्कृतीचा पर्यावरणपूरक दृष्टिकोन स्वीकारणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक डॉ. कुंदन दुफारे यांनी केले. ते आदिवासी अध्यासन केंद्र गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली द्वारा संचालित फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम नुकताच महाविद्यालयात पार पडला. “गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती आणि इतिहास ” या विशेष चर्चासत्रात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क चे कार्यकारी प्राचार्य डॉ. रुपेंद्रकुमार गौर यांनी गडचिरोली जिल्ह्याचे सामाजिक व धोरणात्मक महत्त्व विषद केले. ते म्हणाले की, गडचिरोली जिल्हा हा अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक कायद्यांच्या अंमलबजावणीची प्रयोगशाळा ठरला आहे. विशेषत: पेसा कायद्यांतर्गत आदिवासी विकासाला पूरक ठरतील असे धोरणात्मक बदल घडवून आणण्यात या जिल्ह्याचे योगदान मोलाचे आहे. समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी केवळ सैद्धांतिक अभ्यास न करता आदिवासी संस्कृतीच्या विविध पैलूंचे सखोल संशोधन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

प्रमुख अतिथी महिला महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. योगेश पाटील यांनी विकासाच्या संकल्पनेपेक्षा ‘शाश्वत विकासाच्या’ अनिवार्यतेवर भर दिला. “आपल्या जिल्ह्यातील लोक निसर्गाशी जोडले गेल्यामुळेच कोरोनासारख्या जागतिक महामारीतही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक कणखर राहिले,” असा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. हा समृद्ध नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा जपत पर्यावरणाचे रक्षण करणे ही आजच्या युवा पिढीची नैतिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले.

व्याख्यानमाला समन्वयक डॉ. विवेक गोर्लावार सदस्य, आदिवासी अध्यासन केंद्र यांनी केंद्राच्या स्थापनेमागील भूमिका स्पष्ट केली. आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास साधणे आणि त्यांच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दस्तऐवजीकरण करणे ही केंद्राची प्राथमिक उद्दिष्टे असून, त्या दृष्टीने विविध चर्चासत्रे, व्याख्याने आणि संशोधन फेलोशिप राबवल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सरिता बुटले यांनी केले, संचालन डॉ. कविता उईके यांनी तर आभार ग्रंथालय प्रमुख डॉ. वर्षा तिडके यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. वैभव मसराम, कु. कादंबरी केदार, संदीप बैस, प्रशासकीय कर्मचारी प्रमोद शेंडे, अविनाश वासेकर, हितेश धानोरकर यांनी विशेष सहकार्य केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here