![]()
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील मुदुमतुरा येथे बुद्ध पौर्णिमा निमित्त भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीचा भव्य सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शानदार कव्वाली कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. भाग्यश्री ताई आत्राम (माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठ सेनेट सदस्या) यांच्या प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास वीरगोंनवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी श्रीनिवास वीरगोंनवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बुद्धांच्या विचारांची आजच्या समाजात असलेली गरज अधोरेखित केली. त्यांनी अहिंसा, समता आणि बंधुता या तत्वांवर चालण्याचे आवाहन करत समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. टी. एस. कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अमोल रामटेके, शालिनीताई कांबळे (इंदाराम), अरुण रामटेके, दामोधर वाघाडे, नागेश रामटेके, राजू मडावी, गणपती तावाडे, गोवर्धन जिट्टीवार, विनोद कांबळे, शंकर चालूरकर, पोचन्ना कांबळे, मनोहर तावाडे, राजू जूनगरे, रमेश वाघाडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या शिकवणीतून समाजाला मिळणाऱ्या मार्गदर्शनाचे महत्त्व विषद केले. बुद्धांच्या विचारांमुळे समाजात शांतता, समता आणि बंधुता प्रस्थापित होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
समस्त बौद्ध समाज मंडळ, मुदुमतुरा यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कव्वाली कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला.